मुंबई – काही वर्षांपूर्वी एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक “नायक’ या नावाने हिंदीत आला होता आणि व्यवसायाने पत्रकार असलेला एक सामान्य माणूस एक दिवसाचा मुख्यमंत्री बनल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. अनिल कपूरची ही भूमिका भलतीच गाजली होती. अवघ्या 24 तासांत त्याने घेतलेले लोकहिताचे निर्णय पाहता, एरवी सरकार अथवा प्रशासन किती मुर्दाडपणे काम करते, हे त्यात दाखवण्यात आले होते.
आता मराठीमधला आपण एक संवेदनशील कवी असल्याचे सांगणारे “बिग बॉस-फेम’ आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेले, अभिजित बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बिचुकले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून हे पत्र आता चर्चेत आले आहे.
या पत्रात बिचुकले म्हणतात की, “उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या; नाहीतर सक्तीच्या रजेवर जा. मला 8 मार्च म्हणजेच महिला दिनाला या राज्याचा एक दिवसाचा मुख्यमंत्री करा. म्हणजे मी प्रशासनातील सगळ्यांना कसा सुतासारखा सरळ करतो, ते बघा.’
बिचुकले पुढे म्हणतात की, गेले दहा महिने लॉकडाऊन करून आपण कोरोनाला प्रतिबंध केला, असे भासवत असला तरी सर्वसामान्य जनता, श्रमिक, कष्टकरी शेतकरी आणि विशेष करून आम्हा कलाकारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. राज्याची मला आस्था असल्याने बेरोजगार, उद्योजक, शेतकरी, कलाकार आणि हातावरचे पोट असलेल्या सर्व लोकांची मला आस्था असल्याने मी पोटतिडकीने आपल्याला हे सांगू इच्छितो आहे की, ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झाले आहात, त्याच प्रकारे एक दिवस स्वेच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा. तेच राज्याच्या हिताचे असेल.