मंगलोर (उत्तराखंड) -पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सक्तवसुली संचलनालय अथवा सीबीआय मला घाबरवू शकत नाही. पंतप्रधानांचा हा अहंकार आपल्यासाठी मनोरंजक आहे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमधील मुख्यमंत्री भाजपने सातत्याने बदलले आहेत. कारण ते सर्वच जण एकसारखे भ्रष्ट होते. त्यामुळे एका चोराच्या जागेवर दुसऱ्याला बदलले गेले आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला. हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथील प्रचार सभेला ते संबोधित करत होते.
मी पंतप्रधानांचे ऐकत नाही, असे पंतप्रधानांनी अलीकडेच एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरे आहे. मी त्यांचे ऐकत नाही, कारण मी त्यांना किंवा ईडी, सीबीआयला घाबरत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
शेतीविषयक तीन वादग्रस्त कायदे केवळ देशातील शेतकरी आणि कॉंग्रेसमुळेच मागे घेतले गेले. एकटी कॉंग्रेसच मोदींच्याविरोधात लढा देऊ शकते. कॉंग्रेसला उत्तराखंडमध्ये गरिबांचे आणि बेरोजगारांचे सरकार हवे आहे. दिल्लीमध्ये बसणाऱ्या राजाचे सरकार नको आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा अहंकार आपल्यासाठी मनोरंजक आहे. गेल्या 70 वर्षात देशात काहीच घडले नाही, असे जेव्हा मोदी म्हणतात, तेव्हा त्यांच्यातील अहंकारच बोलत असतो. संपूर्ण देश गेल्या 70 वर्षांपासून झोपलेला होता, असे त्यांना म्हणायचे आहे का? तसे असेल तर रस्ते आणि रेल्वेमार्ग जादूने उभारले गेले का? असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला.