कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथे महामार्गालगत असणारे अतिक्रमणे पीएमआरडीसी विभागाने जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली होती. दोन वर्षापासून वारंवार नोटीसा देऊन सुद्धा अतिक्रमण न काढल्याने ही कारवाई करण्यात आली होती. महामार्गालगत पुणे बाजूने २५ मीटर तर मुंबई बाजूने ३५ मीटर यामधील अतिक्रमणे पाडण्यात आली होती. यावेळी एकूण २५ दुकान वर कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा परिस्थिती तशीच झाली आहे.
इंद्रायणी कॉलनी भागात पावसाळ्यात मोठया प्रमाणात घरामध्ये पाणी शिरून नागरिकाचे मोठे नुकसान होत होते. पावसाचे पाणी जाण्यासाठी आयआरबीने मोरी बांधली होती. यावर व्यवसायिकाने मोठ्या प्रमाणात भर टाकून सदरचा प्रवाह बंद केला आहे. स्वतःच्या व्यवसायासाठी काही नागरिकांनी स्वतःची जागा सोडून आता थेट रस्त्यावरतीच टपऱ्या टाकलेल्या दिसत आहेत.
या दुकानांमुळे येणाऱ्या जाणारी मोठी वाहने यांना वळण घेताना अडचण निर्माण होत आहे. या टपऱ्यांमुळे मोठा अपघात घडू शकतो. या पूर्वीही येथे अपघात झालेले आहेत. तर, पीएमआरडीसी विभागाने या अतिक्रमाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले आहे, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.
मागील वर्षी अतिक्रम विभागाने यावर कारवाई करून ती पूर्णपणे काढले होते. पण पुन्हा त्या ठिकाणी व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे. तसेच नैसर्गिक ओढा व नाल्यावर पुन्हा भर टाकून तो बंद केला आहे .त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदर अतिक्रमण त्वरित काढून नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरू करावा, अशी नागरिकांची मगणी आहे.