पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत पीएमपी बसची संख्या कमी पडत आहे. त्यात आता सोलापूर आणि कोल्हापूर महापालिकांना पीएमपी बस भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पीएमपीकडे दररोज 250 ते 300 बसेस अतिरिक्त ठरत असून, त्या भाडेकराराने इतर महापालिकांना देण्यासाठी पीएमपीने महापालिकांना पत्र पाठवले होते. त्यात सोलापूर आणि कोल्हापूरहून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
यावेळी उपस्थित असेलेल मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “पीएमपीने उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पीएमपीला दोन्ही महापालिका संचलन तूट देत असल्या, तरी प्रत्यक्षात पीएमपी आर्थिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी खर्च कमी करत डीझेलवरील बस बंद केल्या आहेत. तर, ई-बस वाढवल्या आहेत.
दररोज अतिरिक्त ठरणाऱ्या बसेस इतर महापालिकांसह आयटी कंपन्यांना भाडेकराराने देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. डेपो विकसित करतानाच तेथे व्यावसायिक मिळकती विकसित केल्या जातील. त्यामुळेही उत्पन्न मिळेल. जाहिरातींतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी बसथांबे, बसमध्ये एलसीडी तसेच इतर स्वरुपात जाहिरातींची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पीएमपीला उत्पन्नाचे इतर स्रोत मिळणार असून अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.’
जिल्ह्यातील सेवा बंद करणार –
पीएमपी ही शहरासाठी देण्यास स्थापन करण्यात आली आहे. मात्र, एसटीच्या संपामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पीएमपीच्या फेऱ्या जिल्ह्यात वाढवल्या होत्या. आता एसटीचा संप जवळपास मिटल्याने या बसेसची सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पीएमपीला शहरासाठी अतिरिक्त बस मिळणार असून, त्याद्वारे शहरातील संचलन आणखी सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निर्णय कितपत योग्य –
एका बाजूला ठेकेदारांनी संप पुकारल्याने शुक्रवारी पीएमपीची सेवा कोलमडली होती. तर, दुसऱ्या बाजूला पीएमपीच्या बसेस उत्पन्नवाढीसाठी असा निर्णय कितपत संयुक्तिक आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पीएमपीला सध्या केवळ तिकीट विक्री आणि जाहिराती हे उत्पन्नवाढीचे मर्यादित स्रोत आहे. त्यामुळे या बसेस अन्यत्र देण्याच्या प्रयत्न हा उत्पन्नवाढीचा एक भाग असल्याचा खुलासा कुमार यांनी यावेळी केला.