नागपूर – शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केली. म्हणून आज आम्ही सत्तेपासून दूर आहोत, हे नक्की. पण भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि जनतेच्या आशीर्वादाने सत्ता येईल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला जी स्थगिती मिळाली आहे ती उठेल अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
इतकंच नाहीतर 2024 मध्ये भाजपची सत्ता तीन पक्षांसोबत नव्हे एकहाती असेल. महाराष्ट्रचे तीन तेरा वाजवणारे तेरा पक्ष एकत्र आले तरी जनतेत असणारा आक्रोश, चांद्यापासून-बांद्यापर्यत जनता त्राही-त्राही झाली आहे. यामुळे भाजप एकहाती सत्ता मिळावेल असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, संजय राऊत आणि शिवसेनेला मी धन्यवाद देईन की जर ते मागच्या ऑक्टोबर 2019 ला सोबत आले असते तर त्यांनी बेईमानी केली नसती. त्यामुळे पुन्हा आम्हाला युतीचं सरकार आणावे लागले असते. पण कदाचित त्यांनी भविष्यात भाजपचे एकट्याचे सरकार यावे आणि महाराष्ट्राची उन्नती व्हावी, कुठेही स्पीड ब्रेकर कामात नसावा. या एका भव्यदिव्य विचाराने आमच्याशी बेईमानी केली. आता जनता बेईमानीचे उत्तर 2024 मध्ये दाखवेल. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांनी जी बेईमानी आमच्यासोबत केली, त्यातून आम्हाला निश्चितपणे उत्साह, ऊर्जा प्राप्त होऊन सरकार येईल, यात शंका नाही.