Pm Narendra Modi : आजपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करताना त्यांनी देशाने नकारात्मकता नाकारल्याचे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
हिवाळी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या पराभवाचा समाचार घेतला. त्यांनी, ‘जे हरले आहेत त्यांनी संसदेत पराभवाचा राग काढू नये. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यासोबतच लोकशाहीत पक्ष आणि विरोधक हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच राजकीय विश्लेषकांनी हा निवडणूक निकाल सकारात्मक पद्धतीने देशासमोर मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयावर यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘काही लोक याला प्रो-इन्कम्बन्सी, गुड गव्हर्नन्स किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात पाहायला मिळत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचे मंदिर हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी तयार राहून संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी.
पीएम मोदी म्हणाले की, देशात थंडी हळूहळू वाढत असली तरी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साहवर्धक आहेत. देशाचे भविष्य निश्चित करणारे हे निकाल आहेत. चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत यावे, असे आवाहन करतो. बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.
विरोधकांना सल्ला देताना पीएम मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग बाहेर काढण्याचे नियोजन करण्याऐवजी त्यांनी मागील पराभवातून धडा घेऊन 9 वर्षांची नकारात्मकता सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे वाटचाल केली तर त्यांच्याकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलेल. तसेच त्यांनी निषेधाच्या बदल्यात निषेधाची पद्धत सोडली पाहिजे. विरोधकांनी आपल्यातील उणीवा मोजाव्या असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे विरोधकांना आवाहन करताना,”मी तुम्हाला सभागृहात सहकार्य करण्याची मनापासून विनंती करतो. याचा तुम्हालाही फायदा होईल. यातून देशाला सकारात्मकतेचा संदेश जाईल आणि तुमची प्रतिमा बदलेल, सकारात्मक विचार घेऊन या, आम्ही 10 पावले चालू आणि तुम्ही 12 पावले चालाल. पराभवाचा राग सभागृहाबाहेर काढू नका, तुम्ही निराश व्हाल, निराश व्हाल पण ताकद दाखवण्यासाठी काहीतरी करावे लागेल.असे त्यांनी यावेळी म्हटले.