नवी दिल्ली – ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 810व्या उरुसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यावर “चादर’ अर्पण केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश वाचून दाखवला. पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या भारतातील आणि परदेशातील अनुयायांना या वार्षिक उरुसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या जगभरातील अनुयायांचे 810व्या उरुसाच्या निमित्ताने स्वागत आणि शुभेच्छा. अजमेर शरीफ येथे चादर अर्पण करून मी जगभरात मानवतेचा संदेश पोहोचवणाऱ्या महान सुफी संतांना अभिवादन करत आहे. विविधतेमधून एकता ही भारताची ओळख आहे. विविध पंथ, समुदाय यांचे सौहार्दपूर्ण सहअस्तित्व आणि विचारधारा हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
महान संत-महात्मे, पीर, फकीर यांनी विविध कालखंडात देशाची सामाजिक सांस्कृतिक वीण बळकट करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. या वैभवशाली परंपरेत प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव अतिशय आदराने आणि श्रद्धेने घेतले जाते, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.