मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला आज (10 फेब्रुवारी) हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. मुंबई महापालिका निवडणूका होईपर्यंत पंतप्रधान मोदी यांचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईत असू शकतो असा टोला राऊत यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
“पंतप्रधान मोदी मुंबईत घर घेऊ शकतात किंवा राजभवनात मुक्काम करू शकतात. कारण महापालिका जिंकण्यासाठी या मुंबई महाराष्ट्रातील भाजप आणि मिंधे गटाचे लोक समर्थ नाहीत टीका यावेळी संजय राऊत यांनी केली. मोदी आले आणि अख्खा देश लावला तरी महापालिका शिवसेना जिंकेल याची खात्री असल्याने मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय असंही राऊत यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळं मुंबईकरांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील एक पोस्ट देखील मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कुलाबा, रिगल जंक्शन आणि पी डमेलो रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंतच्या वाहतुकीवर दुपारी 2 ते 4 या वेळेत काही प्रमाणात परिणाम होईल. त्याचबरोबर, देशांतर्गत विमानतळ ते मरोळपर्यंत उन्नत मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत किंचित बदल केला जाणार आहे.