नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची आज भेट घेतली. प. बंगालमधील महिला आज संतापात आहेत. संदेशखाली येथे निर्माण झालेले वादळ आता हा द्विप ओलांडून राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. केवळ एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी राज्यातील सरकारने सगळी शक्ती पणाला लावली अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तृणमूल कॉंग्रेसच्या राजवटीत महिला शक्तीवर अत्याचाराचे घोर पाप घडले आहे. संदेशखालीत जे घडले त्यामुळे कोणाचीही मान शरमेने खाली जाईल. मात्र तुमच्या दु:खामुळे येथील सरकारला काहीही फरक पडत नाही. तृणमुलचे सरकार महिलांच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावते आहे. त्यांना अगोदर कोलकाता उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला आहे.
गरिब, आदिवासी, दलित कुटुंबांतील या मुलींवर, भगिनींवर तृणमूल कॉंग्रेसचे लोक ठिकठिकाणी अत्याचार करत आहेत. राज्यातील सरकार हे महिलाविरोधी आहे व ते महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही अशा शब्दांत त्यांनी ममता यांच्या सरकारला लक्ष्य केले.
तृणमुल कॉंग्रेसचे भले होणार नाही
केंद्र सरकारचे काम पाहुन आज संपूर्ण देश, प. बंगाल आणि सर्व माता भगिनी म्हणत आहेत की अबकी बार एनडीए की सरकार ४०० पार. सगळा देश हा भारतीय जनता पार्टीचे कुटुंब आहे. भाजप कशाप्रकारे नारी शक्ती विकसित करून त्याला भारताची शक्ती करतो आहे याचे हा कार्यक्रम मोठी साक्ष आहे. बलातकारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आम्ही केली आहे. संकटाच्या वेळी माता आणि भगिनी सहजपणे तक्रार करू शकतील यासाठी आम्ही हेल्पलाइन तयार केली आहे. मात्र तृणमूलचे सरकार ही व्यवस्था लागू करू देत नाहीये. अशा महिलाविरोधी तृणमूल सरकारचे कधीही भले होणार नाही.
१४० कोटी जनता माझे कुटुंब
पंतप्रधान म्हणाले, मी अगदी लहान वयात झोळी घेऊन घराबाहेर पडलो. देशाच्या कानाकोपऱ्यात हिंडलो. काहीतरी शोधत होतो. माझ्या खिशात एक रूपयाही नसायचा. मात्र देशवासियांना जाणून अभिमान वाटेल की माझा देश, माझ्या देशातील माता- बहिणी आणि देशातील प्रत्येक कुटुंब कसे आहे. खिशात पैसे नाही आणि भाषाही येत नव्हती. मात्र कोणतेतरी कुटुंब, कोणतीतरी भगिनी भाउ काही खाल्ले की नाही अशी विचारायची. अनेक वर्षे केवळ खांद्यावर एक झोळी घेऊन मी फिरत राहीलो. मात्र तरीही मी एक दिवसही उपाशी राहीलो नाही. त्यामुळेच मी म्हणतो की देशातील १४० कोटी जनता हेच माझे कुटुंब आहे.