नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात देशातील लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. येत्या 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार असून त्यानंतर ज्या ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉट निर्माण झालेले नाहींत त्या ठिकाणी लॉकडाऊनमधे शिथिलता देण्याचा निर्णय जाहीर केला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताने करोनाच्या संबंधात वेळीच उपाययोजना केल्यामुळे देशात आज जगाच्या तुलनेत करोनाची बाधा कमी प्रमाणात झाली आहे असे त्यांनी नमूद केले. या लॉकडाऊनच्या अडचणीच्या काळात लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याची आपल्याला कल्पना आहे. त्यांच्या या धैर्याबद्दल आपण लोकांना नमन करतो, असे नमूद करीत पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. पण त्याचवेळी ही महामारी रोखण्यासाठी आपल्याला 3 मे पर्यंत लॉकडाऊन पाळावा लागेल. राज्य सरकारे आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदींनी सांगितलेली सप्तपदी
– घरातल्या वृद्धांची काळजी घ्या
– लॉकडाऊनची लक्ष्मण रेषा ओलांडू नका
– प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा, आयुष मंत्रालयाच्या सुचना पाळा.
– आरोग्य सेतू मोबाईल ऍप डाऊन लोड करा.
– गरीब कुटुंबाची काळजी घ्या. गरजूंना अन्न द्या.
– कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका.
– डॉक्टर, पोलीस व वैद्यकीय कर्मचारी या योद्ध्यांचा आदर करा.
तथापि पुढील सहा दिवस म्हणजे 20 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनच्या निर्णयाचे आपल्याला काटेकार पालन करावे लागेल. या संबंधात प्रत्येक राज्य आणि प्रत्येक जिल्ह्याने केलेल्या उपाययोजनांवर काटेकोरपणे लक्ष दिले जाईल. त्यानंतर तेथील निर्बंध शिथिल करण्यासंबंधात निर्णय घेतला जाईल अशी माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. देशात करोनाचे नवीन हॉटस्पॉट निर्माण होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी सप्तपदी म्हणजेच सात महत्वाच्या सूचनाही देशवासियांना केल्या आहेत.
आजच्या भाषणात पंतप्रधानांकडून काही सवलती किंवा शिथीलतेच्या संबंधात घोषणा होतील, अशी देशवासियांची अपेक्षा होती. देशातील इकॉनॉमिक ऍक्टीव्हीटी काही प्रमाणात सुरू करण्यास अनुमती दिली जावी अशी शिफारस काही केंद्रीय मंत्रालयांकडूनही करण्यात आली होती. त्या संबंधात मोदींनी म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या या लॉकडाऊनची मोठी किंमत आपण मोजली आहे. पण मानवी जीव वाचवण्यासाठी या उपाययोजना अत्यंत गरजेच्या आहेत असेही त्यांनी या भाषणात नमूद केले.