नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन सुरू असतानाही शेतकरी बांधवांच्या आवश्यकतेनुसार त्यांना खतांचा पुरवठा भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली “नॅशनल केमिकल ऍन्ड फर्टिलायजर्स’च्या माध्यमातून केला जात आहे.
कंपनीच्यावतीने नानगल, भटिंडा, पानिपत इथल्या प्रत्येकी एका आणि विजयपूर इथल्या दोन अशा एकूण पाच खत प्रकल्पांमध्ये 100 टक्के क्षमतेने खतनिर्मिती सध्या सुरू आहे. या पाच प्रकल्पांमध्ये प्रतिदिनी 11 हजार मेट्रिक टन खताची निर्मिती केली जाते. तसेच हे खत विक्रीसाठी बाजारपेठेत पॅकींग करून बाहेर पाठवले जाते, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मिश्रा यांनी सांगितले.
आगामी काळात शेतकरी बांधवांना खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही प्रकल्पाचे कामकाज सुरू ठेवून त्यांच्यापर्यंत वेळेवर खते पोहोचविणे म्हणजे सरकारची शेतकरी बांधवांविषयी असलेली वचनबद्धता पूर्ण करणे आहे. सध्याच्या काळात खतांचे कारखाने सुरू ठेवणे ही एक यशोगाथाच आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून “एनएफएल’ सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
भारत सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत देशातले खतांचे कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला लॉकडाऊनची झळ बसणार नाही. तसेच शेतकरी बांधवांना आगामी खरीप हंगामामध्ये पुरेशी खते मिळू शकणार आहेत.