मुंबई: पंतप्रधानांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अर्थव्यवस्थेच्या उभारणीबद्दल कोणताच उल्लेख नाही. करोनाच्या लॉकडाऊन मुळे गरिबांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यांच्यासाठी कोणतेही मदत पॅकेज पंतप्रधानांनी या भाषणात जाहींर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या भाषणात काहीच दम नव्हता, अशी टीका शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.
मोदींच्या भाषणावर टीका करताना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या की, पंतप्रधानांनी आपल्याला त्यांच्या भाषणात भांडी घासायला किंवा दिवे लावायला सांगितले नाही एवढेच आपले नशीब म्हणायचे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केवळ लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच मार्गदर्शक तत्वेही जाहींर केली पाहिजे होती. त्यांच्या भाषणात केवळ व्यर्थ बडबडीशिवाय काहीही नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, मोदींच्या भाषणात गरिबांना आणि मजुरांना मदत जाहीर होणे अपेक्षित होते; पण त्यांनी ती दिली नाही. याच पक्षाचे दुसरे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे की, देशापुढे आज मोठी आर्थिक संकटे आहेत त्याविषयी ते काहीं तरी उपाययोजना जाहीर करतील असे वाटले होते; पण त्यांच्याकडून निराशाच झाली आहे.