मुंबई – २०१९ च्या निवडणुकीनंतर झालेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस म्हणाले की, “सरकार स्थापनेला शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा होता. मी आणि अजित पवारांनी उगाच शपथ घेतली नव्हती. तर आमच्यावर तशा जबाबदाऱ्या सोपावण्यात आल्या होत्या. मात्र शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल करून निघून गेले. त्यांनी आमच्याबरोबर डबल गेम केला. उद्धव ठाकरे यांनी आधीच आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले होते,” असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, “आमचा शपथविधी होण्याच्या तीन-चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. कारण आम्ही पूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. पण शेवटी शरद पवार आमच्याबरोबर आले नाहीत. त्यामुळे आमचं सरकार पडलं. त्यावेळी जे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला, त्याची सुरुवात शरद पवारांसोबत बोलूनच करण्यात आली होती.”