मुंबई – शिवसेनेशी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका झाली. तसेच विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांकडून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.
आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकार केल्याच्या निर्णयावर आपल मत मांडलं आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले,’माझं अस्तित्वच भाजपामुळे असून भाजपानं बनवलं म्हणून मी उपमुख्यमंत्री झालो. भाजपा हटली, तर माझं काहीच अस्तित्व नाहीये. त्यामुळे माझा पक्ष मला जे सांगेल, ते मी करेन. माझ्या पक्षानं तर उपमुख्यमंत्री करून माझा सन्मान केला. त्यांनी मला चपराशी बनायला सांगितलं असतं तरी मी झालो असतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे म्हणाले,’मी म्हणालो होतो की मला सरकारमध्ये कोणतंही पद नकोय. मी पक्षाला सांगितलं होतं, यानं असा संदेश जाईल की मी पदासाठी इतका लालची झालोय की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला पक्षसंघटनेतलं काम द्या. तसंच ठरलं होतं. पण नंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यांना असं वाटलं की आघाडी सरकार आहे. याला चालवायला हवं. त्यासाठी कुणीतरी अनुभवी तिथे असायला हवं. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला. पण उपमुख्यमंत्रीपदी बसायचंय हा माझ्यासाठी धक्का होता.’ असंही त्यांनी सांगितले