सहकारनगर – टेकडीवर नैसर्गिक जैवविविधता टिकावी या हेतूने वनविभागातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपणातून चुकीच्या झाडांचे रोपण होत असल्याने योजनेच्या मुख्य हेतुलाच हरताळ फासला जात असल्याबाबतचे वृत्त “प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत तळजाई येथील फक्त वाघजाई भागातील टप्प्यात 500 पेक्षा जास्त झाडे निरूपयोगी लावण्यात आल्याने ती बदलावी लागणार असल्याचे उघड झाले आहे. तर, अशा झाडांची संख्या अधिक असल्याचे सहकारनगर नागरिक मंचचे म्हणणे असून कशा कामातून यासाठीचा निधी मातीत जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.
तळजाई टेकडीवरील ग्लिरिसिडिया म्हणजेच रानमारी झाडे काढून त्या जागी स्वदेशी झाडे लावण्याची योजना वनविभागाकडून आखण्यात आली. त्यानुसार वाघजाई भागात रोपणही करण्यात आले. मात्र, यातील 70 टक्के झाडे निरूपयोगी लावण्यात आल्याची माहिती पर्यावरण तज्ज्ञ केतकी साठे यांनी दिली. तर, जैवविविधतेचा अभ्यास असलेली वक्तीच वनविभागाकडे नसल्याने ही चूक झाल्याचे कारण वनविभागाकडून पुढे केले जात आहे.
“टेकडीवर ग्लिरिसिडिया म्हणजेच रानमारी झाडे काढून त्या जागी देशी झाडे लावण्याचे चांगले काम वनविभागा कडून करण्यात येत असले तरी वृक्षांबाबत कुठलाही अभ्यास न करताच अशी परदेशी झाडे लावणे चुकीचे आहे. अशा कामी वनविभागाने पर्यावरण तज्ज्ञंची मदत घेणे गरजेचे आहे.” – वंदना चव्हाण, खासदार
“तळजाई टेकडीवर 15 हेक्टर क्षेत्रात ग्लिरिसिडियाची झाडे काढून तेथे स्वदेशी झाडे लावण्यात येत आहेत. यासाठी एक कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात येत असून फक्त वाघजाई भागात लावलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली असून तेथील 150 ते 200 नवीन लावलेली झाडे बदलावी लागणार आहेत.”- प्रदीप शंकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुरडा