पुणे – “मानवी जीवनासाठी पर्यावरण आवश्यक असते आणि पर्यावरण संतुलनासाठी जास्तीत-जास्त झाडे लावणे गरजेचे आहे. वृक्ष जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने वृक्ष लागवड उपक्रम महत्त्वाचा असून या माध्यमातून अधिकाधिक झाडे लावणे, लावलेली झाडे जगवणे आणि त्यांची वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त महापौर मुक्ता टिळक यांच्या संकल्पनेतून टिळक रस्ता परिसरात 100 झाडांची लागवड हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा प्रारंभ खासदार बापट आणि पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून झाला.
यावेळी बकुळीच्या रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, कसबा विधानसभा भाजप अध्यक्ष नगरसेवक राजेश येनपुरे, वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आदित्य माळवे, गणेश सोणूने, कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे आशिष महादळकर, नगसेवक अजय खेडेकर, धीरज घाटे, महेश लडकत, सम्राट थोरात, नगरसेविका गायत्री खडके, सरस्वती शेंडगे,रघु गौडा उपस्थित होते. या उपक्रमात ज्ञान प्रबोधिनी, डी.ई.एस. स्कुल, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, नू.म.वि. मुलींची प्रशाला, एस.पी.एम. इंग्लिश स्कुल, महाराष्ट्रीयन मंडळ आणि न्यू इंग्लिश स्कुलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
महापौर टिळक म्हणाल्या, “लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जाणार असून केवळ अर्ध्या तासात टिळक रस्त्यावर 100 झाडे लावण्यात आली, ही आनंदाची बाब आहे. या परिसरातील शाळा, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा संवाद वाढवा आणि मैत्री आणि समनव्यय राखून वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविला गेला’.
गोळवलकर गुरुजी शाळेचे प्रसाद लागू यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन, तर हर्षल रोटे यांनी आभार मानले.