औंध (प्रतिनिधी) – दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री यमाई मूळपीठ डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. येथे गेल्या वर्षापासून वृक्षलागवडीस सुरुवात केली.
गावातील युवक, वृध्द, सामाजिक कार्यकर्ते व कामानिमित्त बाहेर असणाऱ्या औंधप्रेमींच्या सहकार्यातून वृक्षलागवड व संगोपनाचे नियोजन होते. यावर्षीही आषाढी एकादशी व कृषीदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यास सुरूवात करण्यात आली. शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या या कामाचे कौतुक सर्वस्तरातून होत असून गुरुवारी दि. 9 रोजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन खाडे, नियोजन मंडळाचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मूळपीठ डोंगरावर शिवसंकल्पने गेल्यावर्षी वालेली झाडे 100 टक्के जगवली आहेत. यापुढेही लावलेली झाडे शंभर टके जगविण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचे व पाणी व्यवस्थापनाची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश खैरमोडे यांनी दिली. यावेळी मुन्ना खाडे, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत कदम, बाळासाहेब पोळ, हणमंत शिंदे, सदाशिव इंगळे, अरुण रणदिवे, बाळकृष्ण कुंभार, पपू मदने, शिवसंकल्प प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.