सातारा (प्रतिनिधी) – मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान व बहुजनांचे श्रद्धास्थान असणाऱ्या राजगृह बंगल्यावर काही माथेफिरूंनी बंगल्यात घुसून तोडफोड केली त्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रतापसिंहनगर येथे रॅली काढून जोरदार निदर्शने करण्यात आली.
प्रतापसिंहनगरात रिपाई (ए) च्यावतीने निषेध रॅली व निदर्शने दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महाराष्ट्रातील दलित व बौद्ध यांच्यावरील होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची चौकशी होऊन अत्याचार थांबवण्यात यावेत. मुंबई येथील राजगृह हल्ला म्हणजे मोठे षडंयत्र आहे. दलित तरुणांची डोकी भडकवण्याचे षडंयत्र रचण्यात येत आहे. हे षडयंत्र आंबेडकरी जनतेने हाणून पाडायचे आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश द्यावेत अन्यथा तालुक्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला. या आंदोलनात विमल भालेराव, भागाबाई ओव्हाळ, आम्रपाली ओव्हाळ, जिल्ह्याचे नेते राजू ओव्हाळ, जितेंद्र भोसले, जिल्हा उपाध्यक्ष युवक राम लंकेश्वर, रामा कांबळे, धनाजी वाघमारे पिंटू गायकवाड, तालुका युवक अध्यक्ष नाना जाधव, विशाल भोसले आदी सहभागी झाले होते.