राष्ट्रीय प्राधिकरण, पालिकेचेही दुर्लक्ष
फुरसुंगी – हडपसर-सासवड पालखीमार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था दुर्गंम भागातील रस्त्यासारखी झाली आहे. या भागात तासन्तास वाहतूक कोंडी होत असल्याने चालक त्रस्त आहेत. या रस्त्यावरून चालणेही पादचाऱ्यांना कठीण झाले आहे.
हडपसर-सासवड या महामार्गालगतचे शेकडो वृक्ष रुंदीकरणाच्या नावाखाली पाच ते सहा वर्षांपूर्वी तोडण्यात आली. परंतु, गेल्या सहा वर्षात रस्त्यावरचा खडाही हललेला नाही. खड्डेच खड्डे, दगड-गोटे, चिखल, सांडपाणी, अरुंद रस्ता आणि यातून होणारी वाहतूक कोंडी ही येथील नागरिकांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.
हडपसर-सासवड महामार्गावर सत्यपूरम, तुकाईदर्शन, भेकराईनगर चौक, विठ्ठल पेट्रोलियम, फुरसुंगी फाटा, रेल्वे उड्डाणपुल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सत्यपुरम ते उरुळी देवाची पोलीस चौकी दरम्यान रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्याने पावसाचे सर्व पाणी रस्त्यावर साचून राहत आहे.
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे तसेच रस्त्यावरील मोऱ्या कचरा अडकून बंद पडल्या आहेत. परंतु, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महानगर पालिकेच्या रस्ते विभागाचेही दुर्लक्ष आहे. या मार्गावरील किती अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार? असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.