राहाता – प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी बनावट पुरावे निर्माण करून अहवाल तयार केला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची चौकशी करून त्यांना भारतीय प्रशासन सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा उपस्थित होते.
नगरपरिषदेमध्ये होणाऱ्या सभेचे कामकाज हे नगराध्यक्षांच्या अधिकारात चालत असते. नगराध्यक्ष हे पीठासीन अधिकारी असतात. सभा चालू असताना मुख्याधिकाऱ्यांनीही अध्यक्षांच्या परवानगीने सभेमध्ये बोलायचे असते. परंतु त्यांनी कुठल्याही नियमांचे पालन न करता सभेचे कामकाज स्वतःच्या हातात घेतले.त्यांनी अहवालामध्ये सदस्यांची मंजुरी व ना मंजुरी, असा उल्लेख केला आहे. त्यामध्ये सभेमध्ये झालेले ठराव हे बहुमतांनी मंजुर झालेले असतात.
मित्तल यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 19 जुलै 2019 रोजी सभा झालीच नाही, असे म्हटले आहे. वास्तविक या दिवशी सभा झालेली असून, आमच्याकडे सदस्यांचे सहीचे पत्र आहे.
राहाता शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात रस्ते तोडले, असे मुख्याधिकारी यांनी अहवालात म्हटले आहे. फक्त जनतेत गैरसमज निर्माण होण्याकरीता हेतुपुरस्कर मुख्याधिकारी यांनी अहवालात भूमिगत गटारीचा उल्लेख केला आहे, असे निवेदनात नगराध्यक्षा पिपाडा यांनी म्हटले आहे.