तालुक्यातील पिके पडली पिवळी ः करपा रोगानेही घातले थैमान
जामखेड – दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केल्यानंतर औषधांची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडून त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडी बियाणे आणून टाकली होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप व लावलेला कांद्याची पात पिवळी पडून करपू लागली आहेत. तेव्हा शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. देशात सध्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ला असून, प्रतिकिलो कांद्याच्या बाजारभावाने डबल सेंच्युरी पार केली आहे. दुसरीकडे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पीक धोक्यात आले आहे.
मोठ्या भांडवली खर्चातून लागवड केलेला हा कांदा परतीच्या पावसाच्या संकटातून सुटून आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाच्या संकटात सापडला आहे. सकाळी पडणारं धुकं, दव यामुळे कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी संतोष अडले यांनी सांगितले.
सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पातींवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. एकीकडे कांद्याने शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असले, तरी कांद्याचे बाजारभाव वाढूनही सर्वसामान्य बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच आहे.
कांदा जगवण्यासाठी धडपड
सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी तालुक्यात असून, सध्या सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. कांदा पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असल्यामुळे शेतकरी सध्या कांदा जगविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.