पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गतवर्षी 13 जुलैअखेर 625 मिली मीटर पाऊस होऊन देखील 42.18 टक्के पाणीसाठा होता. तर यंदा 1 जूनपासून 646 मिलीमीटर पाऊस होऊनही धरणात फक्त 30.59 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे धरणात गतवर्षांपेक्षा 12 टक्के पाणीसाठा कमी आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती, तळेगाव व पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतींबरोबरच पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाने ओढ दिल्याने या धरणातील पाणीसाठा 17 टक्क्यांवर पोचला होता. तर तालुक्यातील छोट्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरूवात केला होता.
यामध्ये पवना, आंद्रा, वडिवळे, टाटा डॅम यांचा समावेश होता. त्यामुळे शहरावरील पाणीकपातीचे संकट आणखी गहरे झाले होते. तसेच महापालिकेने पाणी कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, लांबलेल्या मान्सूनने मात्र, जूनअखेर म्हणजे 29 जूनपासून जिल्ह्यात हजेरी लावली. 8 जुलैपर्यंत धरण परिसरात पावसाची चांगलीच संततधार सुरू होती. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ होऊन 30.59 टक्यांवर पोहचला आहे.
सध्या धरण परिसरात गेल्या चार दिवसांत अत्यंत कमी म्हणजे फक्त 29 मिली मीटर पावसाने हजेरी लावली आहे. पाणीसाठ्यात वाढ होत नसल्याचे चित्र आहे.