कोपरगाव – तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम दि.25 जुलैपर्यंत जमा न केल्यास 31 जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा कोपरगाव तालुका कृती समितीने दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, ऊस, कांदा तसेच कपाशी व इतर सर्व पिकांचे नुकसान झालेले होते. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी निर्णय घेतला. पंचनामा करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती.
सध्या खरिपाच्या पेरण्यांनी वेग पकडलेला असून शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बियाणे व खते इत्यादी घेण्यासाठी चिंतेत आहे. वरील प्रमाणे राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यास त्यास खरीप हंगामासाठी बियाणे व खते घेण्यास आर्थिक मदत होईल.
येत्या दि.25 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात वर्ग न केल्यास दि.31 जुलैपासून कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई प्रत्यक्षात मिळेपर्यंत बेमुदत उपोषणाचा इशारा तहसीलदार यांना कोपरगाव कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, शिवसेना (उ.बा.ठा.) तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस नितीन शिंदे, किसान कॉंग्रेसचे विजय जाधव, शेतकरी तुषार विद्वांस, कोपरगाव बिग बागायतदार सोसायटीचे सदाशिव रासकर, अनिलराव शेवते, नरेंद्र गिरमे, हेमंत गिरमे, कैलास देवकर आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यातर्फे नायब तहसीलदार यांनी निवेदनाचा स्वीकार केला.