देहूगाव, (वार्ताहर) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहू नगरीत येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने विविध कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. बुधवारी ( दि. २७ ) संपन्न होत असलेल्या बीज सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवासुविधांसाठी निवाऱ्यातील जागा, अंगण-प्रांगण, स्वतःच्या घरातील – सदनिकेतील शौचालय उपलब्ध करून देणे,
पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहतुकीला अडथळा होऊ नये, बीज सोहळा सुरक्षीत पार पडावा, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे यांनी केले आहे. देहू नगरपंचायत हद्दीतील पथदिवे दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहे.
तर मुख्यमंदिर ते चौदा टाळकरी कमान दरम्यान रस्त्यांवर गर्दी होऊ नये, तसेच अतिक्रमण वाढू नये यासाठी रस्त्यांच्या दुर्तफा असलेल्या पदपथांवर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. पट्ट्यांच्या पुढे येणाऱ्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई करीत दोन हजार रुपये दंड घोषित केला आहे. चौदा टाळकरी कमान ते मुख्य प्रवेशद्वार परिसर तसेच देहू – आळंदी मार्ग व देहू – देहूरोड मार्गावरील असणाऱ्या रस्त्यांवरील दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर अचानक कारवाई करण्यात येत आहे.\
नगरपंचायतच्या अग्निशमन वाहनाद्वारे मुख्य प्रवेशद्वार,चौदा टाळकरी कमान, मुख्य मंदिर पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडून इंद्रायणी नदी घाट परिसर, गावठाणातील अंतर्गत रस्ते, स्वच्छ करण्यात येत आहे. धूर फवारणी करण्यात येत आहे. भाविक, ग्रामस्थांना शुद्ध, स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पाण्याची तपासणी करून घेण्यात येत आहे.
तसेच इंद्रायणी नदीपात्र स्वच्छ राहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढली जात आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रात मिसळणारे दूषित पाणी रोखण्यासाठी नदीत मिसळणाऱ्या गृहप्रकल्पांची व सोसायटयाची दूषित पाणी अडविले आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे.