पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात खरेदी करयला गेल्यावर हमखास साहित्य घेण्यासाठी पिशवी नसते. त्यामुळे विक्रेत्यांकडूनच प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरिबॅग) मागितल्या जातात आणि ग्राहक जाऊ नये म्हणून प्रमाणीत नसलेल्या पिशव्या दिल्या जातात. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून उदंड जाहल्या प्लास्टिकच्या पिशव्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच बंदी असता नाही या पिशव्या वापरल्या जात असून संबंधितांवर कठोर कारवाई होणार का असा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग) उत्पादन व विक्रीवर बंदी आहे. महापालिकेने २० फेब्रुवारी २०१० रोजी याबाबत ठरावही पारित केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्लास्टिक पिशव्या (कॅरीबॅग) यांची विक्री व उत्पादनाला बंदी आहे, तरीही गेल्या सुमारे १४ वर्षांपासून या प्रमाणीत नसलेल्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून नंतर या पिशव्या कचऱयात टाकल्या जातात. त्यांचे विघटन होत नाही. अनेकदा त्या कचऱयासोबत जाळल्या जातात. परिणामी प्रदूषणात भर पडत आहे.
तसेच अनेकजण बाजारातून आलेल्या पिशव्यांमध्ये घरातील राहिलेले अन्नपदार्थ टाकतात. ते खाण्यासाठी प्राणी ती पिशवीच खातता. त्यातून प्राण्यांच्या पोटातही या पिशव्या आढळून येत आहेत. त्यामुळे पशूधनावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ टाकू नयेत.
बाजारात पिशव्या
बाजारात भाजी आणण्यासाठी गेल्यावर अनेकदा विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून भाजी देतात. सोबत पिशवी असली तरी घरी आल्यावर भाज्या वेगळे करण्याचा त्रास नको म्हणून अनेकजण त्या पिशव्या घेतात व आपल्या पिशवीत टाकतात. तर, अनेकदा सोबत पिशवीच नसते. त्यामुळे विक्रेत्यांकडे पिशवी मागीतली जाते. त्यामुळे बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर सरुच आहे. तसेच घरी आलेली पिशवी पुन्हा कचऱयात जाते. त्यामुळे या पिशव्यांचा वापर आणि व्यापार होतच आहे.
पिशवी सोबत ठेवण्याची सवय लावा
अनेकदा अचानक घरी काही घेऊन जायचे असले तर, पिशवी नसते. त्यामुळे विक्रेत्यांकडूनच पिशव्या घेतल्या जातात. त्यामुळे घराबाहेर पडणाऱया स्त्री आणि पुरुषाने सोबत कापडी, कागडी पिशवी ठेवल्यास त्याचा वापर करता येऊ शकतो. तसेच विक्रेता प्लास्टिकची पिशवी देत असला तरी त्याला नाही म्हणायला हवे. त्यामुळे पिशव्यांचा वापर कमी होईल.
पालिकेकडून कारवाई
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. त्यासाठी भरारी पथके महापालिका प्रशासनाने तयार केली आहेत. बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना प्लास्टिक पिशवी घेतली तर विक्रेत्याला पाच हजार तर ग्राहकाला पाचशे रुपये दंडापोटी मोजावे लागतात. पण अपवाद वगळता संबधित प्रशासनाकडून कारवाई होत नाही. तसेच पहिल्यांदा विक्री करताना आढळून आला तर विक्रेत्यावर पाच हजार व नंतर परत तसाच प्रकार झाला तर २५ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. तरीही या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.