वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफर्स प्रकरणी आरोप झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही टूजी आणि कोळसा घोटाळ्याचा आरोप झाला. मात्र गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये कॉंग्रेसवर तोफ डागली.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, आम्ही देश आणि राज्याच्या विकासाकरिता एकत्र आलेलो आहोत. विरोधकांकडे प्रचारासाठी काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे ते मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करीत आहेत. आम्ही संविधान बदलणार असल्याचे सांगत आहेत.
मात्र भाजपनेच संविधान दिन साजरा करण्यास सुरूवात केली आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितले की विरोधात राहून विकासकामे होत नाही. बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या माणसाला इतरांच्या बरोबर आणण्याकरिता सत्तेचा वापर केला पाहिजे. त्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. पुन्हा मोदी पंतप्रधान झाले तर अल्पसंख्यांक समाजाला पाकिस्तानला पाठविणार, असा खोटा प्रचार करीत आहेत.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, इको सेन्सेटिव्ही झोनमुळे जागा जागेवर पडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आचारसंहिता संपल्यावर याबाबत केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविणार आहोत. हुंदाई प्रकल्प होत असताना जनरल मोटार्सच्या कामगारांवर अन्याय होणार नाही.
हुंदाईलाही देखील याबाबत निर्देश दिले जाईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे तीन हजार कोटींचा प्रकल्प कोकणमध्ये होऊ शकला नाही. आम्ही परदेशात जाऊन प्रयत्न केल्यामुळे हीच कंपनी आता कोकणमध्ये सात हजार कोटींचा प्रकल्प करणार आहे.
गडबड खपवून घेतली जाणार नाही
आपल्या भाषणात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. राष्ट्रवादीचे तळागाळातील काही कार्यकर्ते प्रचार करताना गडबड करीत आहेत. माझ सोशल मिडियावर लक्ष आहे. काही गडबड केली तर बघा, असा सज्जड दमही दिला.