पिंपरी – उद्योगनगरी पिंपरी चिंचवड मधील विविध कंपन्या आणि आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांची पोलीस पडताळणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच कामगारांकडून कंपन्या आणि आस्थापनांमध्ये चोरी, मारहाण आणि फसवणुकीसारखे गुन्हे घडत आहेत. त्यामुळे शहर पोलिसांच्या हद्दीतील सर्व कामगारांची पोलीस पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात औद्योगिक कंपन्या, माहिती तंत्रज्ञान कंपन्या असलेला मोठा परिसर आहे. देशातील प्रमुख औद्योगिक शहर म्हणून शहराची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे इथे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरात लाखो नागरिक स्थायिक झाले आहेत. मात्र कामासाठी येऊन काही दिवसांनी परत फिरणाऱ्या कामगारांची संख्या कितीतरी लाखांच्या घरात आहे.
कुठलीही नोंदणी नसलेले कामगार शहरात येऊन गुन्हेगारी कृत्ये करतात. त्या कामगारांची पोलीस पडताळणी न झाल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येतात. त्यातच कंपन्यांचे नुकसान देखील होते. नोंदणी नसलेल्या कामगारांनी चोरी, हाणामारी यासह खून, खुनाचा प्रयत्न करत दरोडे घातल्याचा घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची पडताळणी होणे आवश्यक आहे.
बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पोलीस पडताळणी करणे बंधनकारक आहे. पोलीस पडताळणी झाल्यानंतरच या कंपन्या कामगारांना प्रत्यक्ष काम सुरू करण्यास परवानगी देत असल्याने हिंजवडी, तळवडे परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत काम करणाऱ्या बहुतांश कामगारांची पोलीस पडताळणी झाली आहे. इतर कंपन्यांमध्ये देखील अशा प्रकारचे नियम लागू करण्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. कंपनी प्रशासनाशी चर्चा करून सर्व कामगारांचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत सूचना दिल्या जात आहे.
परराज्यातील कामगारांच्या पडताळणीसाठी विलंब
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील रहिवासी पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आले असतील तर त्यांची पोलीस पडताळणी तीन आठवड्यांमध्ये होते. मात्र इतर राज्यातून आलेल्या कामगारांची पडताळणी होण्यासाठी अधिक वेळ लागतो. एखाद्या परराज्यातील कामगाराची पडताळणी करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून संबंधित राज्यातील पोलिसांकडे अहवाल जातो. तिथले स्थानिक पोलीस संबंधितांची चौकशी करून अहवाल बनवून परत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे पाठवतात. त्यानंतर पडताळणी अर्जावर पुढील कार्यवाही होते. इतर राज्यातील पोलीस हा अहवाल पाठविण्यास अनेक दिवसांचा कालावधी लावतात, त्यामुळे परराज्यातील कामगार आणि नागरिकांची पडताळणी होण्यासाठी विलंब होतो.
शहर परिसरात काम करणाऱ्या कामगारांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. कंपन्यांसोबत चर्चा करुन कामगारांची पडताळणी केली जात आहे.
-विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड