पिंपरी – जागतिक शून्य कचरा दिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील क क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय उपक्रमाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते गुरूवार (दि.30) उद्घाटन करण्यात आले.
क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभी “आम्ही कचरा निर्माण करत नाही, आम्ही संपत्ती निर्माण करतो” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
स्वच्छतेविषयी जनजागृतीचे कार्य करणाऱ्या व टाकाऊ वस्तूंपासून विविध वस्तूंची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले शून्य कचरा कार्यालय होण्याचा मान पालिकेला मिळवून दिल्याबद्दल उपक्रमात सहभागी सर्व टीमचे अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सिताराम बहूरे, शीतल वाकडे, राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, स्वच्छ समन्वय कक्ष प्रमुख सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता संजय घुबे, शशिकांत मोरे, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे, सहायक आरोग्यधिकारी तानाजी दाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम देशमुख यांनी तर राजेश आगळे यांनी आभार मानले.
पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये शून्य कचरा उपक्रम
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये लवकरच शून्य कचरा उपक्रम राबविला जाईल. तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालयात देखील शून्य कचरा उपक्रम लवकरात लवकर राबविण्याबाबत सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना आयुक्त सिंह यांनी सुचना दिल्या.
पहिल्यांदा कापडी पिशवी, नंतर कारवाई
क क्षेत्रीय कार्यालयात सुका कचरा, पालापाचोळा व निर्माल्य असा महिन्याला सुमारे 2 टन आणि वर्षाला 24 टन कचरा निर्माण होत होता. या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत असून त्याचा वापर उद्यान विभागासाठी करण्यात येणार आहे. कार्यालयात प्लास्टिकची पिशवी व बॉटल घेऊन आलेल्या अभ्यांगतांचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्या अभ्यांगताकडील प्लॅस्टिक पिशवी संकलित करून त्यांना कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. अभ्यांगत दुसऱ्यांदा प्लास्टिक पिशवी घेऊन कार्यालयात आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
असे आहे शून्य कचरा कार्यालय
क्षेत्रीय कार्यालयात एकूण 153 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांकडून दैनंदिन निर्माण होणारा जेवणाचा कचरा, वापरलेले कागद, वापरलेले पेन, कार्यालय परिसरातील झाडांचा पालापाचोळा व प्लास्टिक यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल, जेवणाचा प्लॅस्टिकचा डब्बा, प्लॅस्टिकची पिशवी बंद करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणारा लेखनाचा आणि छपाई केलेला पेपर फाडून कचरापेटीत टाकला जायचा. तथापि या उपक्रमांतर्गत वापरलेले कागद याचे संकलन करून लगदा तयार करून पुर्नवापर करण्यात येणार आहे व त्यातून मिळणारे नवीन कागद हे कार्यालयासाठी उपलब्ध होणार आहे.