पिंपरी – केंद्र सरकारने युद्ध पातळीवर आणि खूपच व्यापक स्वरुपात हर घर शौचालय योजना राबविली. ही योजना खूपच महत्त्वाकांक्षा मानली जात होती. सरकारच्या महत्त्वाकांक्षा आणि संकल्पनांनाच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र विद्या नगर (प्रभाग क्र. १०) परिसरात दिसून येत आहे. विद्या नगर (प्रभाग क्र. १०) मधील तुळजाभवानी मंदिर जवळील ड्रेनेज लाइन निष्कृष्ट दर्जाची झाली आहे. जुनी ड्रेनेज लाइन काढून नवीन ड्रेनेज पाइप लाइन टाकण्यासाठी नागरिकांना स्वाक्षरी मोहीम राबवावी लागली. घरगुती शौचालय नसल्यामुळे रात्री अपरात्री शौचालयासाठी जायचे कुठे? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
अनेक वर्षांपूर्वी विद्यानगरमधील गोल्डन तरुण मंडळ, जय भवानी वजन काटा, जय भवानी तुळजा मंदिर जवळील परिसरात ड्रेनेजसाठी १२ इंची पाइप टाकण्यात आले होते. परंतु उंदीर व घुशींमुळे तसेच पाइपमध्ये माती जमा होऊन खड्डे पडले. मोडकळीस आल्याने ड्रेनेज चेंबर मधून मैला पाणी बाहेर पडते आहे. पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने लहान मोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे घरगुती शौचालय वापरण्यास अडचण येत आहे.
गंभीर परिस्थिती
आजच्या आधुनिक युगात विद्यानगर परिसरातील नागरिकांना शौचालयासाठी गंभीर परिस्िथती अनुभवावी लागत आहे. जुनी मैला ड्रेनेज लाइन चेंबर, तसेच काही भागांत मैला ड्रेनेज लाइनच नसल्यामुळे नाइलाजास्तव नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. महिलांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आदेश देऊन कामे मार्गी लावावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
परशुराम बसरकोड म्हणाले,‘‘ विद्यानगरमध्ये शौचालय नाही. तसेच ड्रेनेज लाइन टाकलेली नाही. याबाबत महापालिका संबंधित अधिकारी यांना संपर्क साधून ही बाब निदर्शनात आणून दिलेली आहे. ’’
गंगाधर काळे म्हणाले, ‘‘ शौचालय, मैला ड्रेनेज लाइन नसल्याने घरगुती शौचालय बांधण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेने सार्वजनिक बांधलेली शौचालय बऱ्याच अंतरावर असल्यामुळे रात्री अपरात्री बाहेर पडायचे म्हणलं की भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अंधारात अनेकजण खड्ड्यात व गटरीत पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना स्वाक्षरीचे पत्र दिले आहे. या पत्रावर परशुराम बसरकोड, गंगाधर काळे, प्रितम तेलंग, अरुण पात्रे, विजय चव्हाण, संजय कदम, परशुराम जाधव, लहु पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.