पिंपरी – प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चऱ्होलीतील काटे कॉलनी ते दिघीतील दत्तनगर दरम्यानचा बीआरटी मार्ग कार्यान्वित झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, या मार्गावरील सिग्नल यंत्रणा अद्यापही कार्यान्वित न झाल्याने बीआरटी बसला इच्छितस्थळी पाहोचण्यास अधिक वेळ लागत आहे. तर यामुळे अन्य वाहन चालकांनादेखील मुख्य चौक व रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी अधिक सतर्कता बाळगावी लागत आहे.
गेली आठ-दहा वर्षांपासून रखडलेल्या चोविसावाडीपासून दिघीपर्यंत साधारण आठ किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गातून सोमवारपासून (दि.12) पीएमपी बसचे संचलन सुरू झाले आहे. मात्र, या संचलनामध्ये पीएमपी बसची वाहतूक जलद गतीने व्हावी, यादृष्टीने उभारलेली सिग्नल यंत्रणा पाच दिवसांनंतरही सुरू झालेली नाही. तीर्थक्षेत्र आळंदी व पुणे, पिंपरी-चिंचवड यांना जोडणारा रस्ता असून, या मार्गावरील नागरिकरणाने मोठा वेग घेतल्याने चोवीस तास या मार्गावर वाहनांची ये-जा सुरू असते.
आळंदी-दिघी बीआरटी मार्गाने पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात जाण्याकरिता बस उपलब्ध आहेत. यात आळंदीहून निगडी, भोसरी, हिंजवडी, बालेवाडी, पिंपरी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, सांगवी, दापोडी, बाणेर, जांबे, मनपा भवन, स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, भेकराईनगर आदी मार्गावरील बस जातात. याशिवाय, दिघीतील मॅगझीन कॉर्नर येथून भोसरी, निगडी, आकुर्डी, चिंचवडला जाणाऱ्या तर भोसरीहून वाघोली, भेकराईनगर, हडपसर, पुणे स्टेशन, लोहगाव, बोपखेलकडे जाणाऱ्या बसची संख्याही अधिक आहे.
अधिकारी फोन उचलेनात
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सिग्नलयंत्रणा बसवून ती वाहतूक विभागाकडे हस्तांतरित केली असल्याची बाब समजते. मात्र, या मार्गावरील सिग्नल नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद आहेत, हे जाणून घेण्याकरिता बीआरटी विभागचे महापालिकेतील उपअभियंता एस.डी. साळी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश माने व दिघी-आळंदी वाहतूक शाखेचे पलीस निरिक्षक दिलीप माने यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने या विभागांची भूमिका समजू शकली नाही.
सात ठिकाणचे सिग्नल बंद अवस्थेत
काटे कॉलनी ते दत्तनगर या प्रवासादरम्यान काटेवाडी, चऱ्होली फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी, संकल्प गार्डन, बालाजी मंदिर, थोरल्या पादुका, माऊलीनगर, मॅगझीन हे बस थांबे आहेत. याशिवाय चार ठिकाणी रस्ता क्रॉसिंग आहेत. याठिकाणाहून बसचा जलदगतीने प्रवास व्हावा, याकरिता उभारलेली सिग्नलयंत्रणा बंद असल्याने एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा करणारे वाहनचालक बीआरटी बस संचलनात
अडथळे ठरत आहेत.