पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) -बोपखेल व खडकीस जोडणारा मुळा नदीवरील पुलाचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. खडकीच्या बाजुने जोड रस्त्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी एप्रिलअखेर काम पूर्ण करून पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, गेल्या सात वर्षांपासून बोपखेलवासियांची परवड होत असून लवकरात-लवकर पुलाचे काम करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सुरक्षेच्या कारणामुळे दापोडीतील सीएमईने 13 मे 2015 ला बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. तेव्हापासून बोपखेलच्या रहिवाशांना सुमारे 15 किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. या नागरिकांच्या सोईसाठी महापालिका बोपखेल व खडकीस जोडणारा 1 हजार 866 मीटर लांबीचा पुल उभारत आहे. बोपखेलच्या बाजूने व नदी पात्रावरील पुलाचे काम होऊन वर्ष झाले आहे. संरक्षण विभागाकडून एनओसी न मिळाल्याने तब्बल 14 महिने खडकीच्या बाजूने काम बंद होते. अखेर एनओसी मिळाल्यानंतर 2 ऑक्टोबर 2021 ला त्या बाजूने काम सुरू करण्यात आले आहे.
ऍम्युनिशन फॅक्टरी, 512 आर्मी बेस वर्कशॉप व संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पुल जातो. त्यामुळे सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारली जाणार आहे. त्यावर 1.5 मीटर उंचीचे व्हीजन बॅरिकेट बसविण्यात येतील. आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण 70 टक्के काम झाले आहे. पुलाचे काम टी ऍण्ड टी इन्फ्रा कंपनी करत आहे. या पुलाच्या कामासाठी 53 कोटी 53 लाख खर्च अपेक्षित आहे. जोडरस्ता, रणगाडा रस्ता, अंतर्गत रस्ते, पुलाच्या कठड्यावरी व्हिजन बॅरिकेटस लावणे आदींचा खर्च 21 कोटी आहे. खडकीच्या बाजूच्या जोड रस्त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे.
न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाच्या परवानग्या व अटी-शर्तीची पूर्तता अशा कारणांमुळे पुलाचे काम सुरू करण्यास विलंब झाला. सद्यस्थितीत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. खडकीच्या बाजूने काम वेगात सुरू आहे. सर्व 76 पिलर उभे केले असून हा पुल एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. – प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता
15 किलो मीटरचा वळसा
2015 मध्ये दापोडीतील सीएमईने बोपखेलवासियांचा मार्ग बंद केला. याविरोधात मोठे जनआंदोलनही झाले होते. मात्र, सुरक्षेचा महत्वाचा मुद्दा असल्याने हा मार्ग सुरू न होता कायमचा बंद झाला. त्यामुळे बोपखेलवासियांना पिंपरी, दापोडी ये-जा करण्यासाठी दिघीतून म्हणजे तब्बल 15 किलो मीटरचा वळसा मारावा लागत आहे. एवढ्या मोठ्या अंतरामुळे गेल्या सात वर्षांपासून बोपखेलवासीय त्रस्त आहेत. त्यामुळे बोपखेल व खडकीस जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम वेगाने करण्याची मागणी नागरिक करत आहेत.