गतवर्षीच्या पुनरावृत्तीची होती भीती; मॉन्सूनच्या आगमनानंतरही करावी लागली प्रतिक्षा
पिंपरी – मॉन्सूनच्या आगमनाच्या भाकितानंतरही नागरिक आणि बळीराजा ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. त्या पावसाचे बुधवारी सायंकाळी जोरदार आगमन झाले. थोड्याच वेळासाठी आलेल्या या पावसाने सर्वांना मोठा दिलासा दिला.
गेल्या वर्षी हवामान खात्याने वर्तविलेल्या भाकितानुसार मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. परंतु पावसाळ्याला खरी सुरुवात 29 जून रोजी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट झेलावे लागले होते. यंदा देखील मॉन्सूनचे आगमन झाल्याची घोषणाही झाली आणि सुरुवातीला पाऊसही पडला. परंतु नंतर मात्र पावसाने दडी मारली. याही वर्षी गतवर्षीच्या पुनरावृत्ती होणार का अशी भीती नागरिकांना सतावत होती. रोज ढग येत होते आणि न बरसताच निराश करुन जात होते. अखेर बुधवारी सायंकाळी थोड्या वेळासाठी का होईना पण जोराचा पाऊस झाला.
यंदा करोनाने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य नागरिक देखील आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत आणि महागाईने देखील जगणे अवघड केले आहे. अशा परिस्थितीत जर पावसाळा लांबला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या भीतीला बुधवारच्या पावसाने काहीसे कमी केले. बुधवारी दुपारपर्यंत ऊन आणि उकाडा जाणवत होता. दुपारनंतर ढगांची दाटी-वाटी झाली आणि काही मिनिटांसाठी जोरदार सरी कोसळल्या. परंतु त्यानंतर पुन्हा आकाश निरभ्र झाले. मॉन्सूनने गेल्यावर्षी प्रमाणे यंदा प्रतीक्षा करायला लावू नये, अशी शेतकऱ्यांसह सर्वचजण प्रार्थना करत आहेत.