मुंबई – भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत, या पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. विद्या चव्हाण, अमोल मिटकरी यांच्यासह स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीही पडळकरांवर बरसले. यावेळी पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे मूर्खपणाचं आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपटून मार खाल्ला. धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री किंवा “यांना’ पवारांचा अडसर वाटणे स्वाभाविक आहे. आधी, तुमच्या भाजपने बहुजनांवर काय अत्याचार केले, ते बघावे. मूर्ख माणसं बडबडत असतात. आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, गोपीचंद पडळकर ज्या विचारधारेचे नेते आहेत, ती विचारधाराच जहरी आहे. त्यांचे बारामतीमध्ये डिपॉझिट जप्त झाले. त्यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका बहुजनविरोधी आहे. त्यांनी सांभाळून बोलावे, अन्यथा त्यांना आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण “उचलली जीभ लावली टाळ्याला’ या उचापती करतात, अशी टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. राजकारणात विरोध असावा, मात्र वैयक्तिक टीका कोणत्या पातळीवर करावी, याला मर्यादा असतात. आमचेही मतभेद होते, मात्र पडळकर यांनी राजकीय सभ्यता शिकून घ्यावी असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
शरद पवार हे राजकीय विरोधक, शत्रू नव्हे – फडणवीस
शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणे चुकीचे आहे, असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलो. फडणवीस म्हणाले, मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली आहे. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणे चुकीचे आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला पूजेसाठी यायचं असेल तर त्यांना येऊ दिले पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.