नवी दिल्ली – रामदेव बाबांनी आपल्या पतंजली संस्थे मार्फत करोनावर खात्रीशीर उपाय करणारी औषधे विकसित केल्याचा दावा केला होता. या औषधांच्या मान्यतेसाठी पतंजली तर्फे आयुष मंत्रालयाकडे रितसर अर्जही करण्यात आला आहे. पण त्या अर्जात हे औषध करोनासाठी आहे याचा उल्लेखच करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हे औषध प्रतिक्रार शक्ती वाढवणारे आणि खोकला तसेच ताप कमी करणारे औषध आहे असे त्यांनी या अर्जात म्हटले आहे, त्यामुळे त्यांच्या या दाव्याविषयी आता संशय व्यक्त केला जात आहे असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
कालच हरिद्वार येथे बाबा रामदेव यांनी करोना रोगावर कोरोनील आणि स्वासरी नावाची औषधे लॉंच केली होती. या औषधांमुळे सात दिवसात करोना शंभर टक्के बरा होतो असे त्यांचा दावा आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आयुष मंत्रालयाने पतंजलीला या औषधांची जाहीरात करणे थांबवण्याची सुचना केली होती. आम्ही हे औषध प्रयोग शाळेत तपासू त्यानंतर आपल्याला त्या विषयीची अनुमती देऊ असे आयुष मंत्रालयाने त्यांना कळवले होते. त्यानुसार पतंजलीने आयुष मंत्रालयाकडे या औषधाला अनुमती मागणारा रितसर अर्ज दाखल केला आहे. पण त्यात हे करोना किंवा कोविड 19 साठीचे औषध आहे असा उल्लेखच टाळण्यात आला आहे.
उत्तराखंड आयुर्वेद विभागाने त्यांना हे औषध विकसित करण्यास अनुमती दिली होती. त्यांना कोणत्या आधारावर हे लायसन्स देण्यात आले आहे याचा तपशीलही आयुष मंत्रालयाने उत्तराखंड सरकारच्या संबंधीत विभागाकडून मागवला आहे.