ठाणे – माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. तसेच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर राणे यांनी आपली भूमिका व्यक्त करत अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे. तसेच पेट्रोल, डिजेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीवर राणे यांनी पक्षाची भूमिक स्पष्ट केली. ते माध्यमांशी बोलत होते.
डिजेल आणि पेट्रोल भारतात तयार होत नाही. ते आपण आयात करतो. अरब देशांनी बॅरेलचा दर वाढवला की, आपल्याकडे दरवाढ होते. सध्या पेट्रोल प्रति बॅरेल ७३ डॉलर असल्याचे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रात ही दरवाढ कमी करायची असेल तर राज्य सरकारने व्हॅट आणि सेल टॅक्स कमी करावा, असा सल्ला राणे यांनी दिला. केवळ लोकांना सांगून प्रश्न विचारायला लावलं जातं, असंही राणे यांनी म्हटले आहे.
अरब देशांनी दर वाढला म्हणून आम्ही वाढवला आहे. देशाच्या अर्थसंकल्पाची १०० टक्के अंमबलबजावणी करायची असेल तर हे करावच लागेल. १० हजार किलोमीटरचे रस्ते महाराष्ट्रात होत आहेत. एवढा पैसा केवळ उत्पन्नाच्या आधारवर येत असल्याचे राणे यांनी नमूद केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प धाडसाचा आणि सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. देशाला आत्मनिर्भर बनवून देशाला महासत्ता बनवणारा अर्थसंकल्प मोदी सरकारने बनवला आहे. हा अर्थसंकल्प जाणून न घेता विरोधक टीका करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प समजतो की, नाही कुणास ठावूक असा टोलाही राणे यांनी लगावला.