पुणे – तंत्रज्ञानातील नव्या बदलांमुळे चांगल्या प्रकारच्या निदानापर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यातून योग्य उपचार करणे सोपे झाले आहे आणि त्यात यशाची शक्यताही वाढली आहे, पर्यायाने बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, कर्करोगातून बरे झालेल्या लहान मुलांच्या ( cancer-free children ) समुपदेशनात अजूनही आपण मागेच आहोत, अशी खंत कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे यांनी व्यक्त केली.
लहानमुलांच्या पुनर्वसनासाठी “टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात’ “एसीटी क्लिनिक’ चालवले जायचे. जे “आफ्टर केमोथेरपी क्लिनिक’ होते. परंतु अशा क्लिनिकची खूप जास्त गरज आहे. ज्यामध्ये मुलांचे मानसिकरित्या पुनर्वसन होणे गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर त्यांची प्रजनन क्षमता पुढे जाऊन ती व्यवस्थित होईल ना, आदी. दरवर्षी 12 लाख कर्करोग ग्रस्त रुग्णांची वाढ होते, त्यात जी लहान मुले आहेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशनाची जास्त गरज असते, असे डॉ. रानडे म्हणाले.
आपल्याकडे “रिसोर्सेस’ कमी असल्यामुळे जो पैसा आहे तो निदान आणि उपचारांमध्येच खर्च होतो किंबहुना तो पैसा तिकडेच वळवला जातो. या कारणामुळे समुपदेशन “पायलेटिव्ह मेडिसीन’ हे दोन महत्त्वाचे भागच मार खातात. या लहानमुलांचे उर्वरित आयुष्य सुखकर करण्यासाठीचे “रिसोर्सेस’ आपल्याकडे नाहीत. गेल्या दहा वर्षांत ते वाढले आहेत; परंतु ते आजच्या लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहेत, असेही डॉ. रानडे म्हणाले.
महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
लहान मुलांच्या कर्करोगात वाढ होत असल्याचे जागतिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. जगभरात 15 वर्षाखालील अंदाजे 2.5 लाख बालके वेगवेगळ्या प्रकारच्या “पेडियाट्रिक कर्करोगा’ने ग्रस्त होतात. यापैकी 80% पेक्षा जास्त प्रकरणे निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येतात. भारतात दरवर्षी सुमारे 50-75 हजार केसेस होतात. दुर्दैवाने सर्व मुले “पेडियाट्रिक कर्करोग’ उपचार सुविधांवर वेळीच पोहोचण्यास सक्षम नसतात आणि आजाराला बळी पडतात. महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे चार हजार ते सहा हजार इतके आहे. तर लहान मुलांच्या कर्करोगात प्रथम स्थानावर उत्तरप्रदेश, द्वितीय-बिहार तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.