नवी दिल्ली – देशात सन 1975 साली जाहींर झालेली आणिबाणी घटनाविरोधी होती असे जाहींर करा अशी मागणी करणारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुप्रिम कोर्टाने दखल घेतली असून या प्रकरणी सरकाराने त्यांची बाजू सादर करावी अशी नोटीस केंद्र सरकारला जारी करण्यात आली आहे.
न्या. एस. के. कौल यांच्या खंडपीठाने ही याचिका सुनावणीला घेण्याचे मान्य केले आहे. तथपि 45 वर्षांच्या अवधीनंतर हा विषय उपस्थित करण्यात आल्यामुळे त्यावर आज सुनावणी घेणे व्यवहार्य ठरेल काय यावर आम्ही विचार करू असे कोर्टाने म्हटले आहे.
आणिबाणीसारखा प्रकार देशात घडायला नको होता असा अभिप्रायही कोर्टाने व्यक्त केला आहे. वीरा सरीन या 95 वर्षीय महिलेने ही याचिका सादर केली असून तिच्यावतीने हरिष साळवे बाजू मांडत आहेत. इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 साली देशात आणिबाणी जारी केली होती ती 1977 साली मागे घेण्यात आली होती.