– प्रतिनिधी
भारताचे सरलष्कर (सीओएएस) जनरल जयंतोनाथ चौधरी यांचा आज स्मृतिदिन (निधन 6 एप्रिल 1983). त्यांचा जन्म 10 जून 1908 रोजी बांगलादेशातील चाटमोहर येथे झाला.हे कुटुंब ब्रिटिश काळात बंगाल प्रांतातील हरिपूरचे चौधरी म्हणून ओळखले जात असे. त्यांची आजी सुकुमारी देवी (दुर्गदासांची पत्नी), नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांची बहीण होती. चौधरी यांच्या आई प्रमिला चौधरी या पहिले काँग्रेस अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या कन्या होत्या, अभिनेत्री देविका राणी, चौधरी यांची चुलतबहीण होती अशा सुशिक्षित संपन्न कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चौधरी यांचे लग्न करुणा चट्टोपाध्याय यांच्याशी झाले होते.
चौधरी यांचे प्रारंभिक शिक्षण कलकत्ता येथील पाताळगंगा अकादमीमधे झाले. (आता हेअर स्कूल). त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झेवियर्स कॉलेज, कलकत्ता येथे झाले. त्यांनी 1923 ते 1926 या कालावधीमध्ये लंडनमधील हायगेट स्कूलमध्ये तसेच रॉयल मिलिटरी कॉलेज, सँडहर्स्ट येथे शिक्षण घेतले. त्यांच्या मिशीमुळे त्यांना टोपणनाव मुचू मिळाले. त्यावेळी अयुबखान (पुढे पाकिस्तानचे लष्करप्रमुख व हुकूमशहा जनरल बनले) व चौधरी लंडन येथे लष्करी शिक्षणासाठी एकाच खोलीत तीन गोर्या प्रशिक्षणार्थींसह राहात होते. त्यावेळी या दोघांनी त्यांच्याबरोबर असलेल्या तीन गोर्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वादावादीमुळे यथेच्छ बदडून काढले. त्या तिघांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे लष्करी कायद्यानुसार त्या दोघांची हकालपट्टी होणार याची खात्री दोघांनाही होती.
मात्र, दोघांचे व इतर तिघांचे म्हणणे अधिकार्याने ऐकून घेतले. अधिकार्याने फैसला सुनावला की दोघेही दोषी आहेत; पण पाच जणांपैकी तिघांना आत्मसंरक्षण करता येत नसल्याने ते तिघे लष्करात रहाण्यास योग्य नाहीत म्हणून त्यांना काढून टाकण्यात येत आहे. मात्र, या दोघांनाही समज देऊन प्रशिक्षणार्थी म्हणून कायम ठेवले. या गोष्टीचा त्यांनी ऋीळशपवी, पेीं चरीींशीी या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे.
फेब्रुवारी 1928 मध्येे त्यांना सँडहर्स्ट येथून भारतीय सैन्यात दुसरे लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतात परत आल्यावर ते नॉर्थ स्टॅफोर्डशायर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यानंतर वर्ष 1929 मधे ते 7व्या लाइट कॅव्हलरीमध्ये सामील झाले. वर्ष 1940 मध्ये मेजर म्हणून, ते 5व्या पायदळ विभागाच्या कर्मचार्यांसह परदेशात गेले आणि त्यांनी सुदान, एरिट्रिया, बिसिनिया आणि आफ्रिकेच्या पश्चिम वाळवंटात लष्करसेवा केली.
वर्ष 1943 मधे त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी निजामशाही संपुष्टात आणण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व जयंतोनाथ चौधरी यांच्याकडे होते. भारत-चीन युद्धातील पराभवानंतर 20 नोव्हेंबर रोजी चौधरी यांनी थापर यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला. वर्ष 1965 मध्येे झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांच्या नेतृत्वाने भारताला विजय मिळाला. निवृत्तीनंतर चौधरी यांची कॅनडात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
चौधरी यांनी लष्करी विषयांवर दोन पुस्तके लिहिली आणि द स्टेट्समन या दैनिकासाठी साहित्य समीक्षक म्हणून काम केले. त्यांना पाश्चात्य संगीताची आवड होती. त्यांनी दिल्ली सिम्फनी सोसायटी, पाश्चात्य संगीताचा प्रचार करणारी संस्था स्थापन केली. त्यांना ग्रँड कॉर्डन ऑफ द युनायटेड अरब ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले तसेच भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला.