नवी दिल्ली – जागतिक पातळीवर मंदी आहे. विशेषतः अमेरिका, युरोपसारख्या विकसित देशातील मंदीमुळे जागतिक व्यापारावर परिणाम झालेला आहे. भारताच्या निर्यातीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही भारताचा विकासदर समाधानकारक राहणार आहे. कारण भारताची देशांतर्गत मागणी भारतीय कंपन्यांना उपयोगी ठरत असल्याचे मत जागतिक बॅंकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केले.
सध्या बंगा भारत भेटीवर आहेत. बंगा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते त्यांनी सांगितले की, इतर देशांना अंतर्गत मागणीचा आधार नसल्यामुळे या अर्थव्यवस्थावर परिणाम होत आहे. मात्र भारतावर त्याचा आतापर्यंत फारसा परिणाम झालेला नाही.
जी – 20 सदस्य देशांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बॅंकेचा आणि भारताचा संबंध बळकट होत आहे. बॅंकेने भारताला बरेच कर्ज दिले आहे. त्या आधारावर आम्ही चर्चा केली. जागतिक अर्थव्यवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत तरी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत आशावादी राहण्यात काहीही अर्थ नाही.
त्यामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेकडून पुढील वर्षापर्यंत कसलाही आधार मिळण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात बंगा यांनी जागतिक बॅंकेचे नेतृत्व स्वीकारले आहे. जागतिक बॅंकेचे अध्यक्ष होणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत. भारताने करोनाच्या काळातही दीर्घ पल्ल्याचा विचार करून आर्थिक निर्णय घेतले आणि सुधारणा राबविल्या आहेत. त्यामुळे इतर देशाच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याच आधारावर पुढील पाच वर्षे भारताची अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी करणार असल्याचे दिसून येत आहेत.