वाजेवाडी ग्रामस्थांचा निर्णय : दातृत्वांतून साकारणार अध्यात्मिक ज्ञान आणि मंदिर
केंदूर (वार्ताहर) – वाजेवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी यात्रेसाठी होणारा अनाठायी खर्च टाळून यात्रेसाठी जमा होणारी वर्गणी मुक्ताई मंदिर आणि शाळेसाठी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्वच मंदिरे सुस्थितीत आहेत.मात्र, फक्त उर्वरित ग्रामदैवत असलेल्या मुक्ताई देवीच्या मंदिराचे काम सुरू आहे. दरम्यान, मंदिरासाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शाळेच्या भिंतीची रंगरंगोटी करणे आवश्यक होते.
दोन्ही गोष्टींचा विचार करून ग्रामस्थांनी एकत्र येऊन यावर्षीची यात्रेसाठी होणारी वर्गणी मुक्ताई मंदिरासाठी आणि शाळेसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात घेतला आहे. त्याची सुरूवात म्हणून तीस हजार रुपये शाळेच्या भिंतीवर बोलकी चित्रे रेखाटण्यासाठी आणि संपूर्ण रंगरंगोटीसाठी देण्यात आले.
यात्रा म्हटले की वाद, तंटे घडून येतात. त्यामुळे करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून वाजेवाडी ग्रामस्थांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले आहे. सोमवारी (दि.3) होणाऱ्या यात्रेत पालखीची मिरवणूक व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी यात्रा हंगामाच्या सुरुवातीलाच वाजेवाडी ग्रामस्थांनी जिल्ह्याला आदर्श घालून दिला आहे.
वाजेवाडी गाव हे चौदाशे मतदार आणि अडीच ते तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे.
माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या माध्यमातून माजी सरपंच धर्मराज वाजे आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने गावच्या तलावासाठी चासकमानचा पोटकालवा उपलब्ध झाला आहे. माजी उपसरपंच अमित सोनवणे यांच्या आग्रहाखातर माजी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या माध्यमातून तीन कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. तलावाचे खोलीकरण झाल्यामुळे गाव समृद्ध झाले आहे. दरम्यान, सोनावणे यांच्या माध्यमातून गावात वाचनालाय देखील उभारण्यात आले आहे. विकासांबाबतीत नेहमीच गावचा एकोपा असल्यामुळे विधायक कार्याला ग्रामस्थ नेहमीच पाठबळ देत आहेत. शाळेसाठी संगणक, क्रीडांगण, सीसीटीव्ही आदी सुविधा लवकरच उपलब्ध करणार असल्याचे सरपंच मोहन वाजे यांनी सांगितले.
हिवरे कुंभारचा आदर्श गावकऱ्यांमध्ये बिंबला
हिवरे कुंभार गावाने देखील असा विधायक निर्णय घेऊन यात्रेची वर्गणी शाळेच्या इमारतीसाठी वर्ग केली होती. त्याचप्रमाणे आता वाजेवाडीकरांनी जिल्ह्यात आदर्श घालून दिला आहे. दरम्यान, करंदी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेची नवी इमारत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. शासनाने सर्व शिक्षा अभियान बंद केल्यामुळे अशा प्रकारे शाळेच्या इमारतीसाठी ग्रामस्थांची परवड होत आहे.