ठोसेघर – वनसंपदेने संपन्न असलेल्या परळी खोरे, कास, ठोसघर येथील शेतकरी वन्यप्राणांच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत. वन्य पशुपक्ष्यांकडून शेतीची मोठी हानी होत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने तातडीने करावा आणि त्यांच्या उपद्रवापासून शेतीचे व मानवी वस्तीचे संरक्षण करावे, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी शाळकरी मुलांसह राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढला. या विराट मोर्चात शालेय विद्यार्थी व लहान मुले स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील मुक्त वावर आणि त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी वन विभाग व शासनाने कडक धोरण राबवावे, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील शिरकाव रोखावा अन्यथा त्यांच्यामुळे होणाऱ्या शेतीच्या आणि पाळीव जनावरांच्या नुकसानीचा वार्षिक मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. पर्यटनपूरक व्यवसायांसाठी स्थानिकांना बांधकाम परवाने द्यावेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होणाऱ्यांबरोबरच किरकोळ जखमीला होणाऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी.
वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी स्थानिकांना बंदुकीचे परवाने तात्काळ मंजूर करावेत. वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांच्या कामांना तातडीने परवानगी द्यावी. वन विभागातील नोकऱ्यांमध्ये वनक्षेत्रालगतच्या गावातील युवकांना प्राधान्याने समाविष्ट करावे, या मागण्याही आंदोलकांनी केल्या. या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्यलगतच्या छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्यांमधील नागरिक गेली कित्येक वर्षे वन्यप्राण्यांचा उपद्रव सहन करत आहे.
सद्य स्थितीत ही समस्या सभोवतलच्या सखल भागातील बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सहन करावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून वन्य पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना राखीव वन क्षेत्रात पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्ती आणि शेतीकडे वळवला आहे. या परिसरतील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके वन्य पशुपक्षी फस्त करत आहेत, अशा व्यथा मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांनी मांडल्या.
आम्ही शाळेत जायचे की….
शालेय विद्यार्थीही गणवेश घालून या मोर्चात सहभागी झाले होते. “आम्ही शाळेत जायचे की, वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतात बसून राहायचे’, असा संतप्त सवाल या विद्यार्थ्यांनी केला. पिकाच्या संरक्षणासाठी शेतात थांबावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.