नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणात सरकारने चौकशीचा आदेश द्यावा या मागणीसाठी विरोधकांनी आजही लोकसभेचे कामकाज हाणून पाडले. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दिवसभरासाठी हे कामकाज तहकुब करावे लागले. आजचे कामकाज तहकुब होण्यापुर्वी सरकारने जनरल ईन्श्युरन्स दूरूस्ती विधेयक सभागृहात मांडले, ते आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.
सकाळच्या तहकुबीनंतर दुपारी साडे तीन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले त्यावेळी निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्या वेळीही सभागृहात गदारोळ सुरूच होता,
त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी ईन्श्युरन्स विधेयकावर थेट मतदानच घेण्याची मागणी केली. त्यावेळी आवाजी मतदानाने हा विषय मंजुर करण्यात आला. सकाळपासून दोन वेळा कामकाज तहकुब झाल्यानंतर दिवसभरासाठी हे कामकाज तहकुब करण्यात आले. राज्यसभेतही याच विषयावरून गदारोळ कायम राहिल्याने कामकाज वारंवार तहकुब करावे लागले.