नवी दिल्ली – डिजिटल पेमेंट कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या पेटीएम कंपनी कर्मचाऱ्यांना करोना संकटाच्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये कंपनीकडून 250 कोटी रुपयाचे समभाग दिले जाणार आहेत. ही प्रक्रिया आगामी तीन चार महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या दिलासा देण्याच्या निर्णयासोबत कंपनीत नवीन 500 कर्मचारी भरती करून घेतले जाणार आहेत.
पेटीएमने याप्रसंगी ईएसओपीमध्ये एकूण किती कर्मचारी असणार आहेत यासंबंधीचे स्पष्टीकरण दिलेले नाही. कंपनीकडून या संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी याबाबत खुलासा करेल, अशी अपेक्षा आहे. मागील ऑक्टोबरमध्ये पेटीएमने सध्या कार्यरत असणाऱ्या आणि काही माजी कर्मचाऱ्यांना ईएसओपीच्या माध्यमातून जवळपास 300 कोटी रुपयांचे समभाग विकण्याच्या पर्यायी संकल्पनेला हिरवा कंदील दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
पेटीएमचे सीचआरओ रोहित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांची पुनर्पडताळणी करण्यात येणार आहे. यातील कार्यरत कर्मचाऱ्याची कामाची पद्धत, त्याचे कंपनीतील एकूण योगदान याचा विचार करण्यात येणार आहे. परंतु आजही ज्याचे वर्तन समाधानकारक नाही अशा कर्मचाऱ्यांना सुधारणा करण्यास जादाचे दोन महिने देण्यात येणार असल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.