विमा नियंत्रकांच्या कंपन्यांना सूचना
पुणे – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात आरोग्यविषयक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्याशी सामना करण्यासाठी विमा कंपन्यांनीही पुढाकार घेऊन कार्यक्षमरित्या काम करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत विमा कंपन्यांनी आरोग्यविषयक विमा दाव्यावर दोन तासांत निर्णय घ्यावा, असे “इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍन्ड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडिया’ या विमा क्षेत्राच्या नियंत्रकांनी म्हटले आहे.
सध्याची परिस्थिती असामान्य आहे. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेगळ्या उपाययोनांची गरज आहे. नियंत्रकांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करोनामुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता निर्णय वेगात घेण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांना आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना मानसिक तणावाखाली रहावे लागणार नाही.
आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि इतर क्षेत्रांत कार्यरत कर्मचाऱ्यांचा विमा सरकारकडून किंवा इतर संस्थांकडून उतरविला जात आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 45 लाख रुपयांचा विमा केंद्र सरकारने उतरवला आहे. या काळात विमा कंपन्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावे. काम करताना काही अडचणी आल्यास त्या नियंत्रकांना कळवाव्यात. त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.