पिंपरी – सुमारे अडीच वर्षांपूर्वी वेगवेगळी कारणे सांगत 25 नोव्हेंबर 2019 रोजी शहरावर पाणी कपात लादण्यात आली. पाणी वाटपात असलेल्या अडचणी दूर करुन तीन महिन्यांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु तेव्हांपासून नागरिकांच्या माथी मारलेली दिवसाआड पाणीकपात अजूनही कायम आहे. प्रशासनाकडून दर वेळेस नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. आता आयुक्तांनी एप्रिलच्या मध्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा केला आहे.
तत्कालीन भाजपच्या सताधाऱ्यांसह महापालिका आयुक्तांनी वाढीव 100 एमएलडी पाणी मिळवून शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा वेळोवेळी वायदा केला. मात्र, अद्याप दररोज पाणी पुरवठा करण्यास प्रशासनाला यश आले नाही.
दररोज पाणी पुरवठ्यासाठी तारीख पे तारीख
आता पालिका आयुक्तांनी पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगून एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव 100 एमएलडी पाणी मिळेल आणि शहरातील पाणी समस्या मिटेल, असे आणखी एक आश्वासन दिले आहे.
पूर्वी गळती बंद करु, समान वितरण अशी कारणे पुढे करत आश्वासने देण्यात आली. त्यानंतर मात्र वाढीव 100 एमएलडी पाणी मिळाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करु शकत नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने आश्वासन दिले होते की, हे पाणी लवकरात लवकर आणून शहरावासियांना मार्चअखेरपर्यंत दररोज पाणी पुरवठा करु. परंतु, आता महापालिका आयुक्त पाटील यांनी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव 100 एमएलडी पाणी मिळणार असल्याचे सांगितले. यापूर्वी देखील कधी चार महिने तर कधी तीन महिने अशी पोकळ आश्वासने देण्यात आली आहेत. या आश्वासनांमध्येच अडीच वर्षे निघून गेली.
98 टक्के काम पूर्ण
आंद्रा, भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी चिखली येथील 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. एअरेशन फाउंटेन, क्लॅरीफ्लोक्युलेटर, फिल्टर हाऊस, शुध्द पाण्याची संपवेल इत्यादी मुख्य कामे पूर्ण झाली आहेत. महापालिका आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलणार आहे. त्या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केली जाणार आहे. समाविष्ट गावांना तेथून पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणी टंचाई भासणार नाही, असा विश्वास महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वाढीव 100 एमएलडी पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत वाढीव पाणी मिळेल. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाईल. तेथून त्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातून त्या भागात होणारा पाणीपुरवठा दुसरीकडे वळविला जाईल. 100 एमएलडी पाणी आल्यास नागरिकांना पाणी टंचाई भासणार नाही.
– राजेश पाटील, मनपा आयुक्त