मुंबई – राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या पक्षातील बंडखोरांच्या विरोधात लढण्यासाठी गनिमी कावा वापरत आहेत, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार भाजपसोबत कधीच जुळवून घेणार नाहीत. ते महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत असे राऊत यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या विधानांवरून काही संभ्रम निर्माण झाला असला तरी ते दोन दगडांवर हात ठेऊन आहेत असा अर्थ त्यातून काढता येणार नाही. शरद पवारांबद्दल कोणाचाही संभ्रम नाही,असेही राऊत पुढे म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली हे सत्य नाकारता येणार नाही असेही राऊत म्हणाले.
पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीबद्दल तसेच अजित पवारांच्या भूमिकेबद्दल जे काहीं विधाने केली आहेत त्यावरून सध्या राजकीय क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या विषयी राऊत यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पवारांचीच पाठराखण केल्याचे दिसून आले आहे.