मुंबई: मुख्यमंत्री पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर गैरसमज निर्माण करत आहेत. त्यांना ते स्टेटमेंटच कळलं नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
शरद पवार म्हणाले होते की, पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोकं स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
बीसीसीआयचे अध्यक्ष असताना पवारसाहेब पाकिस्तानला टीमसोबत गेले होते त्यावेळी त्यांना तिथली सर्वसामान्य जनता भारताशी वैर आहे असं वागत नाहीत उलट पाहुण्यांची चांगली खातिरदारी करतात असा अनुभव आल्याचा किस्सा सांगितला होता. परंतु याच वक्तव्याचा विपर्यास करून मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचं हित आम्हाला नाही या भाजप सरकारला आहे असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.
देशातील शेतकर्यांच्या कांदयाला भाव मिळत नसताना एमएमटीसीच्या माध्यमातून पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या भाजप सरकारने देशहित आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.