एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित ; कांदा, सोयाबीन, भात पिकाला सर्वाधिक फटका
पुणे: राज्यात निवडणुका झाल्यावर शिवसेना-भाजप युती झाली नाही. त्याचदरम्यान राज्यासह पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला होता. खरीप हंगामातील बहुतांशी पिके तर भुईसपाट झाली होती. सत्तास्थापनेचा गुंता वाढत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वेळात वेळ काढून सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील बांधावर थेट जात शेतकऱ्यांना दिलासा दिला.
दरम्यान, “युती’त बिनसलं अन् राज्यात महा”शिव’आघाडीची चर्चा सुरू झाली. त्यातही पवार यांनीच पुढाकार घेत सगळे जुळवून आणले. त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने पवार यांनी प्राथमिक बोलणी करून पुन्हा विदर्भातील बांधावर भेट देत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तेथे शासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागल्या. त्यामुळे पवार साहेबांनी किमान एकदा तरी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधाला भेट द्यावी, जेणेकरून जिल्ह्यातील सुस्त प्रशासन कामाला लागेल, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पवार साहेबांना घातली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका बसला आहे, तो भात, द्राक्ष, भुईमूग, कांदा, सोयाबीन मका, भाजीपाला, तरकारी, फळबागा आदी पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात राष्ट्रपती राजवटीच्या अगोदर राज्यसरकारने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. तसेच 10 हजार कोटी रुपयांची तरतूदही केली होती. त्यामुळे सुरुवातीला महसूल, कृषिअधिकाऱ्यांनी कामाला जोरदार सुरुवात केली. मात्र, त्यातच सत्तास्थापनेचे त्रांगडे फसल्याने ते सुटेपर्यंत तरी शेतकऱ्यांना काहीच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनही थोडे सुस्त झाले. त्यांनी ज्या क्षमतेने सुरुवातीला पंचनामे केले, त्या क्षमतेने त्यांनी त्यानंतर काम केले नाही, त्याचा परिणाम असा झाला की, अद्यापही अनेक भागांत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरूच आहे. त्याचबरोबर यादी बनवण्याचे काम ही सुरूच आहेत. त्यामुळे जोपर्यंत याद्या बनणार अन् सरकार बनणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात काही पडणार नाही.
मात्र, शनिवारी (दि. 16) राज्यपालांनी खरिपासाठी 8 हजार, तसेच फळबागांसाठी 18 हजार हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मात्र, प्रशासनाने काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने ही मदत प्रत्यक्षात कधी मिळणार हे स्पष्ट नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. जर महा”शिव’आघाडीचे सरकार स्थापन झाले तर त्वरित नुकसानभरपाईसोबतच संपूर्ण कर्जमाफी पण मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे आता पवार साहेब जिल्ह्यातील कोणत्या बांधावर भेट देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
शेतकरी म्हणतो की…
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिरावल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. दरम्यान, शासनाने पंचनामे केले अद्यापही सुरूच आहेत. मात्र, झालेले पंचनामे आणि प्रत्यक्ष झालेले नुकसान यात मोठी तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच सत्तेचे त्रांगडे फसल्याने नुकसानभरपाई मिळणार की नाही, या चिंतेत शेतकरी होता. मात्र, आता राज्यपालांनी नुकसानभरपाई जाहीर केली असली तर प्रत्यक्षात कधी मिळणार, हे स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांचे कैवारी समजले जाणारे शरद पवार यांना शेतकऱ्यांनी साद घातली आहे.
बारामती तालुक्यावर शरद पवार यांचे खूप प्रेम आहे. ते कृषिमंत्री झाल्यापासून बळीराजाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली असून स्वतः घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात आहेत. महाराष्ट्रातला शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी आहे. दुष्काळाशी दोन हात करतानासुद्धा तग धरून आहे. प्रशासनाने दिसणाऱ्या नुकसानीचा पंचनामा केला आहे, पण न दिसणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी सर्वांना एकसारखा न्याय देण्यासाठी पवार यांनी बारामती तालुक्यात एखादा दौरा करून पाहणी केली, तर शासकीय यंत्रणा वेगवान हालतील. तसेच झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यास लवकरात लवकर मदत मिळण्यास खऱ्या अर्थाने फार मोठी मदत होईल.
– जितेंद्र वाबळे, शेतकरी, काऱ्हाटी
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यास पिकाच्या वर्गवारीनुसार आर्थिक मदत, लाइटबिल माफी, कर्जमाफीसाठी प्रत्यत्न केले पाहिजेत. तसेच चालू हंगामासाठी हरभरा व गहू बियाणे व खते 100 टक्के अनुदानावर ताबडतोब दिले पाहिजे. चालू परिस्थितीत आर्थिक मदत शेतकऱ्याच्या पीकपाण्यानुसार दिली, तर शेतकरी उभारी घेईल.
– संतोष काटे, शेतकरी, कोळोली सुपा