मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभीमान जपण्याचा मूलमंत्र दिला, अशा शब्दात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांना त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. शिवसेनेशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी वाहिलेल्या श्रध्दांजलीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
फडणवीस यांनी ट्विटरवर आपली भावना व्यक्त केली. स्वाभीमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी आपणा सर्वांना दिला, असे त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओसोबत नमूद केले. गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्रीपद वाटपाच्या मद्द्यावरून शिवसेना बाजूला झाली. त्यामुळे शिवसेना वगळून बहुमत सिध्द करता येत नसल्याचे लक्षात आल्यावर सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला.
आपला मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी शिवसेना मुख्यमंत्रीपदा बाबत खोटा दावा करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढले पण शिवसेनेन आपली भूमिका नंतर बदलली, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याचे त्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, यंदाच्या संसद अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकांवर बसेल. रालोआतून बाहेर पडेल, ही आता औपचारिकता राहिली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट जाहीर केली आहे.