Pawan Kalyan : जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारवर पीएम आवास योजनेत फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारने तब्बल ३५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पवन कल्याण यांनी पत्राद्वारे केला आहे.
पवन कल्याण यांनी पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रात त्यांनी ,”राज्यात गृहनिर्माण योजनेच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला जात आहे आणि त्याचा कट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी सरकारने रचला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
Jana Sena Party president and actor Pawan Kalyan writes a letter to Prime Minister Narendra Modi on Housing schemes pic.twitter.com/G03Wq0eFE8
— ANI (@ANI) December 30, 2023
पंतप्रधान आवास योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप
पवन कल्याण यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, “गरिबांसाठीच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना सुमारे 35,141 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली असली तरी राज्य सरकारने त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही,”असे पवन कल्याण यांनी म्हटले आहे.
तसेच जनसेनाप्रमुखांनी पुढे पत्रात , “जमिनीच्या किमती कृत्रिमरीत्या अनेक पटींनी वाढवण्यात आल्या होत्या, परंतु जमीन मालकांना कमी रक्कम दिली गेली आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी जास्तीचा पैसा खिशात घातला आहे.” असे म्हटले आहे.